मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक पार पडली.
कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबुतरखाना प्रश्नासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. यासंबंधित दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कबुतरखाना प्रश्नासंदर्भात सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची व त्याची देखभाल करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गणेश नाईक, आमदार कालिदास कोळंबकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
